महाराष्ट्रात महायुतीचा मोठा विजय; केजरीवालांचा खळबळजनक दावा, दोन दिवसांत पर्दाफाश करणार
नवी दिल्ली-(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) महाराष्ट्रातील निवडणुकीवरून गेल्या दहा दिवसापासून वातावरण तापले आहे. या निवडणुकीवरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करीत आहेत. तरी विरोधी पक्षाकडून ईव्हीएम मशीन विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. जागोजागी आंदोलन करून सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून शेवटच्या तासाभरात वाढलेल्या मतदानावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले जात असताना या वादात आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी उडी घेतली आहे. दिल्लीच्या विधानसभेत बोलताना त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला.
महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होत आहे. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहेत. यावेळी होत असलेल्या या सोहळ्यास पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह 19 राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपचे बडे नेते उपस्थित राहणार असताना याच पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्ये कसा विजय मिळवला याचा पर्दाफाश दोन दिवसांत करेन, असा इशारा केजरीवाल यांनी दिला आहे. केजरीवालांनी केलेल्या या सनसनाटी दाव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
दिल्लीच्या विधानसभेत बोलताना माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. ऑक्टोबरमध्ये हरियाणात विधानसभा निवडणूक झाली. सगळे एक्झिट पोल भाजप पराभूत होईल असा अंदाज वर्तवत असताना भाजपने तिकडे सत्ता टिकवली. त्यांना आधीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.
निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँटे की टक्कर होईल असे चित्र असताना प्रत्यक्षात मात्र महायुतीची त्सुनामी आली. त्यांनी 288 पैकी 234 जागा जिंकल्या. त्यामुळे सत्ताधारी, विरोधकांसह मतदारांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत खळबळजनक दावा केला आहे. विधानसभेत बोलताना केजरीवालांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
येत्या काळात मी भाजपची पोलखोल करणार आहे. संपूर्ण देशासमोर यांचा पर्दाफाश करणार आहे. भाजपने महाराष्ट्राची निवडणूक कशी जिंकली, हरियाणात कसा विजय मिळवला हे मी पूर्ण देशाला सांगणार आहे. दोन दिवसांत मी यांचा पर्दाफाश करेन असा सनसनाटी दावा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या संपूर्ण कटाचे पुरावे माझ्याकडे आहेत. मला साक्षीदारदेखील मिळाले आहेत, असा दावा त्यांनी केला असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.