धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या लेकीवर बलात्कार, गृहमंत्री आहेत की झोपलेत? मनोज जरांगेंनी वाभाडे काढले
धाराशिव -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) धाराशिवमधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर बलात्कार झाला आहे परंतु अजूनही आरोपींना अटक झालेली नाहीये. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस जागे आहेत की झोपलेत? अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसमोर सरकारचे वाभाडे काढले. मनोज जरांगे यांनी धाराशिवमधील प्रसंग सांगितल्यावर सभेत एकच सन्नाटा पसरला.
मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी धाराशिवमध्ये सर्वपक्षीयांची सभा संपन्न झाली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक भाषण करून राज्यातली बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून आणि दररोज समोर येणाऱ्या नवनव्या गुन्हेगारी घटनांवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना जोरदार लक्ष्य केले.
मुख्यमंत्री-गृहमंत्री आपण जागे आहात काय? काय चाललंय राज्यात?
जरांगे म्हणाले, धाराशिवमधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर बलात्कार झाला आहे. मला धाराशिवमध्ये आल्यावर ही घटना कळली. ही हरामखोर अवलाद सरकारच्या लेकीवरती अन्याय करत आहे आणि सरकार म्हणून तुम्ही काहीच करत नाही. आम्ही सरकारवर थुंकतो… मुख्यमंत्री-गृहमंत्री आपण जागे आहात काय? काय चाललंय राज्यात… अशी विचारणा जरांगे यांनी केली.
हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर राज्य बंद करू
मुख्यमंत्री फडणवीस साहेब, या समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवलाय. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मकोका लागेल आणि कुणीही आरोपी सुटणार नाही, असा तुम्ही कुटुंबियांना शब्द दिलाय. जर दगाफटका केला तर तुमच्या सरकारचा कार्यक्रम केलाच म्हणून समजा. या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर राज्य बंद करू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. तसेच आरोपी जर सुटले तर सत्ताधाऱ्यांच्या मी मागे लागेन, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
धनंजय मुंडे यांना आता सुट्टी नाही
मी धनंजय मुंडे यांचे नाव घेत नव्हतो. परंतु ज्या दिवशी धनंजय देशमुखांना त्यांच्याकडून धमकी दिली गेली, त्यानंतर आम्ही शांत बसलो नाही, बसणार नाही. मी २५ तारखेपर्यंत काही बोलणार नाही. पण आरक्षण मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांचे परळीपासून मुंबईपर्यंतचे सगळी प्रकरणे बाहेर काढतो. तो आत्ता माझ्या नादाला लागला, आता त्याला सुट्टी नाही, अशी टीकाही जरांगे यांनी केली.