बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या; अन्यथा राजीनामा देऊ : जानकर
अकलूज -(जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) माझ्या माळशिरस मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी. निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य केली नाही तर 25 जानेवारी रोजी आपण आमदारकीचा राजीनामा दिल्लीत निवडणूक आयोगाकडे देणार, तसेच मी स्वतः आणि बच्चू कडू आम्ही दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणार आहोत असे आमदार उत्तम जानकर यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत सांगितले. दरम्यान, दिल्लीत देखील अशाच प्रकारचा ईव्हीएमचा विषय सुरू आहे. त्यामुळे आमच्याबरोबर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होतील, असेही आ. जानकर यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, ईव्हीएमच्या मुद्याला माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून सुरुवात झाली आणि तोच आक्रोश संपूर्ण तालुक्यात आहे. आता तालुक्यातील धानोरे या गावात देखील ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी 1206 लोकांनी हात वर करून मतदान केले. पण त्या गावात मला 963 एवढीच मते दाखवण्यात आलेली आहेत. आता धानोरे गावातील 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत आणि धानोरे गावातील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. आता जर निवडणूक आयोग मतदानाची पडताळणी करणार नसेल तर 25 जानेवारी रोजी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे.
शरद पवारांना विचारून राजीनामा देणार
धानोरे गावातील 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावाने दिलेले आहे. तसेच मारकडवाडीच्या 1466 लोकांनी प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत. ही प्रतिज्ञापत्रे आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहोत. त्यानंतर आंदोलन करणार आहोत. देशात निवडणूक पारदर्शी व्हावी अशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील भूमिका आहे. मी राजीनामा देणार याविषयी अद्याप आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी बोललो नाही. मात्र, मी त्यांच्याशी बोलून 25 जानेवारी रोजी राजीनामा देणार आहे, असेही आ. जानकर यांनी सांगितले.