वयाच्या पस्तीशीत लव्ह मॅरेज केलेला नवराच नकोसा वाटू लागला, काटा काढण्याचा मास्टर प्लॅन केला, पण नवऱ्याच्या मिठीत आशिक सुद्धा बुडाला अन् प्रेयसीच्या नशिबात जेलवारी! बार्शी तालुक्यातील पांगरी गावच्या घटनेने परिसरात खळबळ
बार्शी- (जन महाराष्ट्र न्युज नेटवर्क) बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणाचा उलघडा झाला असून बायकोनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी विवाहित प्रेयसीला बेड्या ठोकल्या असून नवरा आणि प्रियकर सुद्धा गेला आणि स्वतः जेलवारीसाठी गेली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव तलावातील दोघांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात प्रेयसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्याने त्याचा गळा धरला, पण नवऱ्याने मिठी मारलेली न सोडल्याने कट रचणारा प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावला.
पांगरी पोलिसांनी मयत गणेश अनिल सपाटे (वय 26, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (वय 35) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तसेच प्रियकर महिलेला अटक केली आहे. महागाव (ता. बार्शी) येथील ढाळे पिपळगाव तलावात पुलावरून पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती. त्या दोघांचा मृत्यू संशयास्पद होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सत्यता समोर आणली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बार्शी तालुक्यातील पांगरी गावातील रूपाली पटाडे (वय 35) आणि शंकर पटाडे (40) यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. शंकर हा गाडीचालक होता तर रूपाली ही घरकाम करीत होती. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. हे सुरु असतानाच बार्शीमधील गणेश रूपालीच्या आयुष्यात आला. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरु होताच पती शंकरने रुपालीला गणेशचा नाद सोडायला सांगितला, पण लव्ह मॅरेज करूनही गणेशच्या प्रेमात अखंड बुडालेली रूपाली बेभान झाली होती. त्यामुळे रूपाली आणि गणेश या दोघांनी मिळून शंकरचाच काटा काढायचा निर्णय घेतला.
खून करण्यासाठी कट रचला
18 फेब्रुवारी 2025 रोजी गणेश शंकरचा काटा काढण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेला. सोबत मित्रही होते. दोघांनी मद्य प्राशन सुद्धा केले. दारुच्या नशेत गणेशने शंकरला धाराशिवला कलाकेंद्रात जाऊ असे सांगत कारने निघाले. गणेशने प्लॅन केल्यानुसार एका पुलावर गाडी थांबवण्यास सांगितले. पुलावर डान्स करू व फोटोही काढू असे सांगितले. मध्यरात्रीच पुलावर थांबून डान्स करण्यास सुरुवात केली. यावेळी गणेश शंकरला खांद्यावर घेत पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंकरने गणेशला मारलेली मिठी सोडली नसल्याने गणेश सपाटेही पाण्यात पडला आणि दोघेही बुडाले. दोघांनीही एकमेकांना मिठी मारल्यामुळे बुडून मृत्यू झाला. चौकशीसाठी म्हणून रूपालीला ताब्यात घेतले आणि प्रकरण बाहेर पडले.