सरपंचांची निवड आता जनतेतून! सोलापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची मंगळवारी आरक्षण सोडत; २०३० पर्यंतचे चित्र होणार स्पष्ट
सोलापूर -(जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्याही निवडणुका झाल्या, गावातील निवडणुका मात्र ठप्प झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचांची आरक्षण सोडत मंगळवारी (ता.२२) दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे. या सोडतीनंतर गावातील पुढचे कारभारी कोण- कोण असू शकतात? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सन 2025 ते सन 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत. सदर नियमान्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रीयांसह) सरपंचपदे निश्चित केली जाणार आहेत. ही प्रक्रिया त्या- त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या प्रमुख उपस्थितीत राबविली जाणार आहे. गावांच्या राजकारणाला निर्णायक वळण देणाऱ्या या सरपंच आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे. सरपंचांची निवड आता जनतेतून होत असल्याने या आरक्षण सोडतीला अधिक महत्त्व आले आहे.
आकडे बोलतात…
जिल्ह्यातील एकूण सरपंच : १०२५
जिल्ह्यातील एकूण अनुसूचित जातीचे सरपंच : १५५ (महिला ७८ व पुरुष ७७)
जिल्ह्यातील एकूण अनुसूचित जमातीचे सरपंच : १८ (महिला ९ व पुरुष ९)
जिल्ह्यातील एकूण ओबीसी सरपंच : २७७ (महिला १३९ व पुरुष १३८)
जिल्ह्यातील सर्वसाधारण सरपंच: ५७५ (महिला २८८ व पुरुष २८७)