बार्शीत भारतीय संविधान उद्देशिका १०,००० तक्त्यांचे घरोघरी वाटप होणार – मुख्याधिकारी
बार्शी- (जन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बार्शी नगर परिषदेच्या वतीने भारतीय संविधान सर्वसामान्य जनतेला समजावे या उद्देशाने तयार केलेल्या तक्त्याचे लोकार्पण बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक मनीष रविंद्र देशपांडे आणि साहित्यविश्व प्रकाशनाचे संस्थापक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रती शहरातील घरोघरी वाटण्यात येणार आहेत.
यावेळी नगर परिषदेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या समोरील असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्य अधिकारी विठ्ठल पाटोळे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश वाटोरे, जलदाय अभियंता अजय होनखांबे, नगर अभियंता विवेक देशमुख, आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद, भंडार विभाग प्रमुख भगवान बोकेफोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच संविधान प्रेमी व्यक्ती संस्था आणि संघटना मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या घरात आणि सर्वसामान्य नागरिकांना भारतीय संविधानाचा उद्देश समजावा यासाठी बार्शी नगरपरिषद आणि संविधान प्रचारक लोक चळवळीच्या वतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समानता याविषयी या तक्त्यामध्ये विस्तृत आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या तक्त्यात विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, श्रध्दा स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र्य याबरोबरच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची भूमिका विषद केली आहे. तसेच घटना तज्ञांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण उद्देशिकेचा अर्थ साध्या सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचावा आणि यातून सर्व स्तरावर संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी या तक्त्यांची सोशल म्हुमेंट सपोर्ट सेंटरचे कृतार्थ शेवगावकर आणि मनीष देशपांडे यांनी निर्मिती केली आहे.
या संविधान उद्देशिका तक्त्याच्या दहा हजार प्रती बार्शीतील प्रत्येक घरोघरी लावणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितले. संविधान जनजागृती हाच मूळ हेतू असून संविधानाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेला समजावे हा उद्देश आहे, असे मनिष देशपांडे यांनी यावेळी सांगितले.